अकरावी प्रवेशासाठी आता अखेरची संधी

म. टा. प्रतिनिधी, पुणे राज्यातील ज्युनिअर कॉलेजांमध्ये इयत्ता अकरावीत प्रवेश घेण्यापासून विविध कारणांमुळे वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी पुन्हा एकदा अकरावी प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना २६ मार्चपर्यंत प्रवेश घेता येणार आहे. अकरावी प्रवेशाची ही अखेरची संधी आहे. शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव राजेंद्र पवार यांनी या प्रवेश प्रक्रियेबाबत माध्यमिक विभागाच्या शिक्षण संचालकांना परिपत्रकाद्वारे आदेश दिले आहेत. राज्यात अद्यापही काही विद्यार्थी अकरावीच्या प्रवेशापासून वंचित राहिल्याचे निदर्शनास आले आहे. या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळण्याबाबत सरकारकडे विनंती करण्यात आली आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन त्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये यासाठी २६ मार्चपर्यंत प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्त्वावर प्रवेश घेण्यास मान्यता देण्यात आली आहे. या मुदतीनंतर कोणत्याही परिस्थितीत प्रवेशासाठी मुदतवाढ देण्यात येऊ नये, प्रवेशापासून वंचित असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीच ही प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येईल, कॉलेजांचे पसंतिक्रम बदलण्याच्या कारणांसाठी पुन्हा प्रक्रियेमध्ये समाविष्ट होण्याची संधी देता येणार नसल्याचे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. अधिक माहिती अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3vGeQ2H
via IFTTT

Post a Comment

0 Comments