म. टा. प्रतिनिधी, पुणे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेला १७ नंबरचा अर्ज भरून बसणाऱ्या विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना शाळांमार्फत उद्या ११ एप्रिलपर्यंत अतिविलंब शुल्कासह अर्ज भरता येणार आहे. राज्य मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या एप्रिल-मे २०२१च्या माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेला खासगीरित्या प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांचे नावनोंदणी अर्ज ऑनलाइन पद्धतीने स्वीकारण्याचा कालावधी २८ नोव्हेंबर ते १९ फेब्रुवारी होता. मात्र, आता अर्ज करण्यास मुदतवाढ मिळाली असून, माध्यमिक शाळांनी, कनिष्ठ महाविद्यालयांनी अतिविलंब शुल्क प्रति विद्यार्थी रुपये २० प्रतिदिन घेऊन विद्यार्थ्यांचे अर्ज भरायचे आहेत. अर्ज ऑफलाइन घेतला जाणार नाही. केवळ ऑनलाइन अर्जच स्वीकारले जाणार आहेत. ‘विभागीय मंडळांनी अर्ज स्वीकारताना त्यावर ‘सुपर लेट फॉर्म’ हा शेरा पाहूनच अर्ज स्वीकारावेत. विभागीय मंडळास प्राप्त झालेल्या सर्व अर्जांची तपासणी १६ एप्रिलपर्यंत पूर्ण करावी व त्यातील पात्र, अपात्र विद्यार्थ्यांची यादी तयार करून १८ एप्रिलपर्यंत राज्य मंडळाकडे सादर करावी,’ अशा सूचना राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना दिल्या आहेत. १७ नंबरचा अर्ज ऑनलाइन स्वरुपात भरता येईल. माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना मदत करण्याची सूचना मंडळाने दिली आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना form17.mh-ssc.ac.in, तर बारावीच्या विद्यार्थ्यांना form17.mh-hsc.ac.in या वेबसाइटवर अर्ज करता येईल. यासाठी शाळा सोडल्याचा दाखला, आधारकार्ड, पासपोर्ट फोटो आवश्यक असल्याचे शिक्षण मंडळाने सांगितले. हेही वाचा:


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/321rwn9
via IFTTT