पुढील वर्षी प्रवेशचिंता; दहावीची परीक्षा रद्द झाल्याने प्रश्न उपस्थित

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात यंदा दहावीची परीक्षा न घेण्याचा निर्णय सर्वच शिक्षण मंडळांनी घेतला आहे. परिणामी पुढील शैक्षणिक वर्षात उच्च शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही नेहमीपेक्षा जास्त असणार आहे. यामुळे पुढील शैक्षणिक वर्षात प्रवेश चिंता भासेल, अशी भीती शिक्षण तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. यामुळे सरकारने दहावीची परीक्षा रद्द करताना तसेच मूल्यांकनाचे निकष ठरवताना पुढील शैक्षणिक वर्षासाठी उच्च शिक्षणाच्या जागा वाढविण्यासाठीही विचार करावा, अशी मागणी समोर येत आहे. राज्यात यंदा सुमारे १५ लाख विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. तर दरवर्षी इतर मंडळातून दहावी उत्तीर्ण करणारे सुमारे ५० हजार विद्यार्थी राज्य मंडळाच्या इयत्ता अकरावीसाठी प्रवेश घेत असतात. यामुळे दरवर्षी नामांकित कॉलेजांमध्ये प्रवेशासाठी चुरस पाहवयास मिळते. यंदा ही परिस्थिती अधिक बिकट असेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. राज्यात दहावीनंतर प्रामुख्याने अकरावी, आयटीआय आणि डिप्लोमा या तीन पर्यायांची निवड केली जाते. या तीन अभ्यासक्रमाच्या मिळून राज्यात सध्या सुमारे आठ लाख दहा हजार जागा आहेत. यात आणखी भर पडल्यास त्या पुढील शैक्षणिक वर्षासाठी आठ लाख वीस हजार होण्याची शक्यता आहे. यंदा अंतर्गत मूल्यांकन पद्धतीत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढण्याची शक्यता लक्षात घेता नामांकित शिक्षण संस्थांमध्ये प्रवेशाची चांगलीच चुरस पाहावयास मिळणार आहे. दरवर्षी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांपैकी २० टक्के विद्यार्थी पुढील शिक्षणासाठी पारंपरिक शिक्षण पद्धतीत अथवा अन्य कोणत्याही शिक्षण पद्धतीत प्रवेश घेत नाही, असा अंदाज बांधला तरी यंदा प्रवेशासाठी पात्र विद्यार्थ्यांची संख्या दरवर्षीपेक्षा जास्त असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. राज्य मंडळाचे १५ लाख विद्यार्थी आणि इतर मंडळांचे सुमारे ५० हजार विद्यार्थी यापैकी १३ लाख विद्यार्थी पुढील शिक्षणासाठी प्रवेशास पात्र ठरले तर त्यापैकी कमीत कमी १० लाख विद्यार्थ्यांनी पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेण्याची इच्छा दर्शविली तरी या सर्वांना सामावून घेण्याची क्षमता सध्याच्या आपल्या शिक्षण व्यवस्थेत दिसत नाही असे गणित एका कॉलेजच्या प्राचार्यांनी मांडले. यामुळे राज्य सरकारने विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षण अर्थात दहावीनंतरच्या शिक्षणासाठी पारंपरिक अभ्यासक्रमांच्या नामांकित कॉलेजांमध्ये जागा वाढविण्याचा विचार करणे आवश्यक असल्याचे मतही या प्राचार्यांनी नोंदविले. यापूर्वी अंतर्गत मूल्यमापन बंद केल्यावर आलेल्या निकालानंतर राज्य सरकारने नामांकित कॉलेजांमध्ये त्या वर्षापुरत्या जागा वाढवून दिल्या होत्या. अशा प्रकारचा काही विशेष निर्णय यंदाही घेण्याची आवश्यकता असल्याचे मत तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. दहावीनंतर प्रवेशाच्या अंदाजित जागा अकरावी - ५,६०,००० (ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील जागा) आयटीआय - १,४५,००० डिप्लोमा - १,०५,०००


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3sDlQL9
via IFTTT

Post a Comment

0 Comments