करिअरच्या पर्यायांचा करा विचार

सुचित्रा सुर्वे, मागील वर्षापासून अनेक गोष्टी झपाट्याने बदलत आहेत आणि प्रत्येक जण 'न्यू नॉर्मलशी' आपापल्यापरीनं जुळवून घेण्याचा प्रयत्न करीत आहे. अनेक पिढ्यांची प्रार्थना खरी ठरावी आणि विद्यार्थ्यांना काहीशी दिलासादायक बातमी मिळावी ती म्हणजे रद्द झालेल्या परीक्षा! अनिश्चितता आणि तारखांमधील सततच्या बदलांमुळे 'बोर्ड एक्साम्सच्या' गांभीर्यापेक्षा 'बोअर्ड ऑफ एक्साम्स' अशी काहीशी विद्यार्थ्यांची मनस्थिती निर्माण झाली आहे. खरंच परीक्षेची किती तयारी झाली आहे यापेक्षा लवकरात लवकर परीक्षा देऊन टाकू, जेणेकरून अभ्यास करायचा की नाही करायचा हा गोंधळ तरी संपेल असं जवळजवळ प्रत्येक विद्यार्थ्याला वाटत असेल. या बदलाची सुरुवात केवळ एका बोर्डाच्या निर्णयानं जरी झालेली असली तरी बोर्ड परीक्षा रद्द होण्याची कल्पना वास्तवात येईल असं खरंच कोणाला वाटलं नव्हतं. या निर्णयामुळे विद्यार्थ्यात स्वातंत्र्याची भावना निर्माण झाली. तसंच ताबडतोब पुस्तकांची जागा गॅजेट्सनी घेतली. पुढील प्रवेशप्रक्रिया कशी आणि कधी होणार, सध्याच्या लॉकडाउनमुळे मुलांना गॅजेटमुक्त वातावरणात कसं ठेवलं पाहिजे इत्यादी विचारांनी पालकांच्या चिंतेत आणखी भर पडली. संख्या जरी लहान असली तरी या लॉकडाउनच्या काळात देखील शिस्तबद्ध जीवन व्यतीत केलेल्या, मौजमजा करण्यापेक्षा आपली स्वप्नं साकार करण्यासाठी अभ्यासाची चांगली तयारी करणाऱ्या विदयार्थ्यांना हा निर्णय अनुचित वाटला असेल. उत्तम कामगिरी करण्याची संधी अशी अचानक हिरावून घेतल्यामुळे निराशाजनक वाटणं स्वाभाविक आहे. तेव्हा आपले सगळे प्रयत्न वाया गेले असा विचार करण्यापेक्षा आपली आधीच तयारी झाली आहे असा विचार करा. दुसरीकडे परीक्षा अचानक रद्द केल्यामुळे कमी झालेला ताण, उत्तम कामगिरी करण्याचं ओझं उतरल्यामुळे बहुसंख्य विद्यार्थ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. पण लक्षात घ्या ही केवळ एकच परीक्षा रद्द झालेली असून ज्या संकल्पनांची तुमची पुरेशी तयारी झाली नाही अशा संकल्पना पुढे कधीच उपयुक्त ठरणार नाहीत असं नाही. त्यामुळे रद्द झालेल्या परीक्षांच्या परिणामांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करू नका. परीक्षांकडे जीवनात पुढे घेऊन जाणाऱ्या चरणापेक्षा केवळ उत्तम कामगिरी करणं महत्त्वाचं आहे या दृष्टिकोनातून पहिलं जातं, मनावर कायम बिंबवलं जातं. याचा परिणाम म्हणजे भीती, यश, अपयश, दबाव, तणाव इत्यादी जणूकाही परीक्षा या संकल्पनेचे समानार्थी शब्द बनले आहेत. गुणांच्या चढाओढीमुळे वर्षभर शिकलेले विविध विषय, संकल्पना यावर एखाद्याचे प्रभूत्व किती आहे हे सिद्ध करण्याचं साधन म्हणून परीक्षांकडे पाहण्यास कधीही प्रोत्साहित केलं गेलं नाही. लक्षात घ्या, संकल्पना किती समजली आणि पुढील स्तरावरील अभ्यास करण्यास विद्यार्थी किती तयार आहेत हे समजून घेण्यासाठी परीक्षा हे नक्कीच प्रभावी साधन आहे. म्हणूनच करिअरचा पाया घालण्यासाठी आवश्यक असलेला अभ्यासक्रम शिकण्याची आपली किती तयारी झाली आहे हे विद्यार्थ्यांनी अत्यंत बारकाईने तसेच वस्तूनिष्ठपणे समजून घेणे आवश्यक आहे. ज्यांची अजूनही विषयांची नीट तयारी झालेली नाही अशा विद्यार्थ्यांनी हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे की, भविष्यात परीक्षा आयोजित केल्या जातील तसेच तुम्ही आत्तापर्यंत जे काही शिकलात त्याचा परिणाम पुढील शिक्षणावर होणार आहे. परीक्षा रद्द झाल्यामुळे आनंदी वाटणं साहजिक आहे पण यामुळे शिक्षणाचं महत्त्व कमी होणार नाही याची दक्षता घ्यायला हवी. काही कालावधीनंतर पुन्हा एकदा अभ्यासाला सुरुवात करा, पुढील करिअरसाठी आवश्यक पावलं उचला. छोटासा ब्रेक घेणं योग्य आहे, पण शक्य तितक्या लवकर विविध गोष्टी शिकण्याच्या मार्गावर परत जा. लक्ष केंद्रित करा. तुम्हाला तुमच्या कारकिर्दीबद्दल विचार करण्यासाठी अधिक वेळ मिळाला आहे. तेव्हा तज्ज्ञांचा सल्ला घ्या. अधिक पर्याय आजमावून बघा. स्वत:ला अधिक जाणून घ्या आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी योजना आखा. लक्षात ठेवा, केवळ परीक्षा रद्द झाल्या आहेत, शिक्षण आणि शिकणं नाही!


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3dzEcbu
via IFTTT

Post a Comment

0 Comments