राज्यातील पहिली ते आठवीचे विद्यार्थी विनापरीक्षा पास; शिक्षणमंत्र्यांची घोषणा

राज्यातील शालेय शिक्षण विभागाने मोठी घोषणा केली आहे. राज्यातील करोना स्थिती पाहता, राज्यातील राज्य मंडळाच्या सर्व शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेशिवाय पुढील वर्गात प्रमोट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून ही घोषणा केली. राज्यातील लाखो विद्यार्थी- पालकांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. काय म्हणाल्या शिक्षणमंत्री? पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना प्रमोट करण्याच्या निर्णयाची घोषणा वर्षा गायकवाड यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केली. एका व्हिडिओद्वारे त्यांनी शिक्षक, पालक, विद्यार्थी आणि सर्व संबंधित घटकांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, 'करोना संक्रमणाची स्थिती दिवसेंदिवस वाढत आहे. शालेय शिक्षण विभागाने मधल्या काळात ऑनलाइन, ऑफलाइन, यूट्यूब, गुगल या माध्यमातून शिक्षण सुरू ठेवले. पहिली ते चौथीच्या शाळा आपण संपूर्ण वर्षभर सुरु करू शकलो नाही. पाचवी ते आठवीच्या शाळा काही ठिकाणी सुरू झाल्या, तर काही ठिकाणी नाही. जेथे शाळा सुरू झाल्या तेथेही अभ्यासक्रम पूर्ण करता आले नाही. शिक्षण हक्क कायद्यांतर्गत खरे पाहता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांचे संपूर्ण शैक्षणिक वर्षाचे मूल्यमापन व्हायला हवे, मात्र यावर्षी ते होऊ शकलेले नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांची यंदाच्या वर्षी वर्गोन्नती करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे.' काय पार्श्वभूमी? करोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदाचे शालेय शिक्षण विभागाचे शैक्षणिक वर्ष ऑनलाइन पद्धतीने सुरू झाले. त्यानुसार इयत्ता पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने शिक्षण देण्यात आले. मात्र, इंटरनेट कनेक्टिव्हिटीची समस्या आणि ऑनलाइन शिक्षणासाठी पुरेशा प्रमाणात साधनांची उपलब्धता नसल्याने, विद्यार्थ्यांना शिकण्यात अडचणी आल्या. शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात या अडचणी अधिक होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांचा अपेक्षित अभ्यासक्रम पूर्ण झाला नसल्याने, त्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. इयत्ता पहिली ते आठवीचा निकाल सर्वंकष मूल्यमापन पद्धतीद्वारे जाहीर केला जातो. मात्र, यंदा जिल्हा परिषद, नगरपालिका, नगरपरिषद, महापालिका अशा सरकारी शाळांमध्ये दोन चाचण्या आणि दोन संकलित मूल्यमापन योग्य पद्धतीने होऊ शकले नाही, अशी माहिती शिक्षकांनी दिली आहे. शहरी भागातील अनुदानित शाळांनी ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेतल्या असून, निकाल तयार केला आहे. मात्र, शैक्षणिक वर्ष संपत असून, आता गुणपत्रके तयार करून निकाल जाहीर करण्याची वेळ आली होती.त्यासाठी कोणती कार्यपद्धती अवलंबण्यात यावी, याबाबत शालेय शिक्षण विभागाकडून मार्गदर्शन सूचना मिळाल्या नव्हत्या. या पार्श्वभूमीवर राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी हा निर्णय जाहीर केला. या सर्व पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट पुढील वर्गात प्रमोट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/31GfYp9
via IFTTT

Post a Comment

0 Comments