RTE: राज्यातील ६७ हजार ५५३ विद्यार्थ्यांना मिळणार प्रवेश

‌म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई बालकांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षण कायद्यानुसार आरटीईच्या २५ टक्के प्रवेशासाठी राज्यस्तरीय सोडत गुरुवारी काढण्यात आली. पुणे जिल्ह्याचा अपवाद वगळता राज्यातील तब्बल ६७ हजार ५५३ विद्यार्थ्यांची सोडतीमध्ये निवड झाली. तर मुंबईतील ४ हजार ९८५ विद्यार्थी पात्र ठरले आहेत. निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना ३० एप्रिलपर्यंत पडताळणी समितीकडून कागदपत्रांची पडताळणी करून प्रवेश निश्चित करावयाचा आहे. आरटीई प्रवेशासाठी ३ ते ३० मार्चदरम्यान ऑनलाइन अर्ज मागवण्यात आले होते. राज्यातील नऊ हजार ४३२ शाळांतील ९६ हजार ६८४ जागांसाठी तब्बल दोन लाख २२ हजार ०२९ अर्ज पालकांनी भरले होते. त्यातून ६७ हजार ५५३ विद्यार्थ्यांची निवड झाली. राज्यातून निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये ठाण्यातून सर्वाधिक ९,०८८ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. त्याखालोखाल नागपूरमधून ५,६११ विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत. मुंबईतील ३५२ खासगी शाळांमध्ये आरटीई प्रवेशासाठी नर्सरी आणि पहिलीच्या ६ हजार ४६३ जागांसाठी १२ हजार ९११ विद्यार्थ्यांच्या पालकांनी अर्ज केले होते. यातून चार हजार ९८५ विद्यार्थ्यांची आरटीई प्रवेशासाठी निवड झाली. मुंबईतील चार हजार ९८५ विद्यार्थ्यांमध्ये एसएससी मंडळाच्या शाळेमध्ये तीन हजार ७४५ विद्यार्थ्यांची तर अन्य मंडळाच्या शाळेमध्ये १२४० विद्यार्थ्यांची निवड झाली. यामध्ये पहिलीच्या वर्गासाठी ४५०३ तर प्री प्रायमरीसाठी ४८२ विद्यार्थ्यांची निवड झाली. राज्यभरातील विद्यार्थ्यांची एकत्रितरित्या सोडत काढण्यात आली असली, तरी पुणे जिल्ह्यातील तांत्रिक कारणामुळे काढण्यात आली नाही. ऑनलाइन काढलेल्या सोडतीमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना १५ एप्रिलपासून मेसेज पाठवण्यास सुरुवात करण्यात आली. सोडतीमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी ३० एप्रिलपर्यंत विभागातील पडताळणी समितीमार्फत आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करून प्रवेश घ्यायचा आहे. ज्या पालकांना एसएमएस येणार नाही त्यांनी https://ift.tt/3siCmA5 या वेबसाइटवर अर्ज क्रमांक टाकून सोडतीची तपासणी करण्याचे आवाहनही पालकांना करण्यात आले आहे. प्रवेश निश्चितीची प्रक्रिया सोडतीमध्ये क्रमांक लागणाऱ्या पाल्याच्या पालकांनी सोडत लागलेल्या शाळेजवळील पडताळणी केंद्रावर जाऊन कागदपत्रांची पडताळणी करावी. सर्व कागदपत्रांच्या दोन प्रती काढून एक प्रत पडताळणी समितीकडे व दुसरी प्रत शाळेमध्ये जमा करायची आहे. त्यानंतर आपला ऑनलाइन प्रवेश झाल्याची पावती आणि प्रवेशाची कागदपत्रे दिलेल्या मुदतीत शाळेत जाऊन पालकांनी प्रवेश निश्चित करायचा आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3uVrYQg
via IFTTT

Post a Comment

0 Comments