CBSE, ICSE बारावीच्या परीक्षा रद्द करा; मागणीसाठी सुप्रीम कोर्टात याचिका

देशभरातील करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेत सीबीएसई, आयसीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचे आदेश केंद्र सरकारला द्यावे, अशी विनंती करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. अॅड. ममता शर्मा यांनी ही याचिका केली आहे. त्यांनी असे म्हटले आहे की, करोना संसर्गामुळे बारावीची परीक्षा ऑफलाइन किंवा ऑनलाइन देखील घेणे व्यवहार्य नाही. बारावीचा निकाल उशिरा जाहीर झाल्यास परदेशी विद्यापीठांमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी अडचण होईल आणि त्यांच्या भवितव्याचे कधीही भरून न येणारे नुकसान होईल. त्यामुळे परीक्षा रद्द करून मर्यादित वेळेत वस्तुनिष्ठ पद्धतीने बारावीचा निकाल जाहीर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला द्यावेत, अशी विनंती या याचिकेत करण्यात आली आहे. या याचिकेत शर्मा यांनी केंद्र सरकार, सीबीएसई, आयसीएसई बोर्ड यांना पक्षकार केले आहे. याचिकेत १४,१६ आणि १९ एप्रिल २०२१ रोजी आणि बोर्डांनी जारी केलेल्या अधिसूचना रद्द करण्याची विनंती कोर्टाला करण्यात आली आहे. या अधिसूचनांमधील केवळ बारावीच्या परीक्षेसंबंधीचा निर्णय स्थगित करण्याची मागणी करण्यात आली आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांच्या स्थगितीसंबंधीचा निर्णय अन्यायकारक, सापत्न आणि अमानवी असल्याचे या याचिकेत नमूद करण्यात आले आहे. परीक्षा आणि त्यानंतर विलंबाने लागणाऱ्या निकालामुळे विद्यार्थ्यांच्या पुढील वर्षाच्या एका संपूर्ण सत्रावर परिणाम होण्याची शक्यता याचिकेत वर्तवण्यात आली आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3v2GUfO
via IFTTT

Post a Comment

0 Comments