दहावी निकाल पद्धतीचा हुशार विद्यार्थ्यांना बसणार फटका

म. टा. प्रतिनिधी, पुणे 2021: दहावीच्या निकालासाठी तयार केलेल्या अंतर्गत मूल्यांकनाच्या फॉर्म्युल्यामुळे काठावर उत्तीर्ण होणारे विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होणार आहेत. त्याचवेळी वर्गातील अनेकांना चांगले गुण मिळणार असल्याने दहावीत वर्गात टॉपर येण्याचे स्वप्न पाहणाऱ्या प्रामाणिक विद्यार्थ्यांना मात्र फटका बसण्याची शक्यता अभ्यासकांनी वर्तविली आहे. अशा परिस्थितीत मूल्यांकनाचा तिढा वाढण्याची शक्यता आहे. करोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारने दहावीची परीक्षा रद्द करून, नववी आणि दहावीतील अंतर्गत मूल्यांकनाच्या आधारे निकाल जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या अंतर्गत मूल्यांकनामुळे विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या गुणांबाबत शंका व्यक्त करण्यात येत आहे. या अंतर्गत मूल्यांकनामुळे विद्यार्थ्यांचा जाहीर होणारा निकाल योग्य राहणार नसल्याबाबतही मते व्यक्त करण्यात येत आहेत. या मूल्यांकनाच्या पद्धतीमुळे ऑनलाइन शाळेला जाणीवपूर्वक दांडी मारणाऱ्या; तसेच अभ्यासाकडे लक्ष न देणाऱ्या विद्यार्थ्यांना फायदा होणार असल्याचे शिक्षकांनी सांगितले. मात्र, त्याचवेळी हुशार विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीतीही व्यक्त करण्यात आली आहे. दहावीच्या परीक्षेला गांभीर्याने न घेता, केवळ परीक्षेला प्रविष्ठ होणारे अनेक विद्यार्थी दर वर्षी अनुत्तीर्ण होतात. सर्व प्रकारच्या सुविधा असूनही, यंदा अनेक विद्यार्थी ऑनलाइन शाळेला उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे परीक्षा झाल्या असत्या, तर हे विद्यार्थी काठावर उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण झाले असते. मात्र, यंदा परीक्षा नसल्याने अंतर्गत मूल्यांकनावर निकाल जाहीर होणार आहे. अशा परिस्थितीत शाळांकडून या विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळणार असल्याचे शाळेच्या मुख्याध्यापकांनी सांगितले. खरे 'टॉपर' येणार एक पाऊल मागे अंतर्गत मूल्यांकनाच्या आधारे शाळेतील अनेक विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळणार आहेत. त्याचवेळी हुशार विद्यार्थ्यांची नववीतील कामगिरी चांगली नसल्यास त्याचा फटका दहावीच्या निकालात बसणार आहे. दहावीत प्रामाणिकपणे वर्षभर चांगली तयारी करून, वर्गात किंवा शाळेत प्रथम येण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यालाही याचा फटका बसू शकतो. या अंतर्गत मूल्यांकनाच्या फॉर्म्युल्यामुळे शाळेतील अनेकांना उत्तम गुण मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रत्येकाला टॉपर होण्याची संधी मिळणार असून, खऱ्या 'टॉपर'ला कुठे तरी एक पाऊल मागे यावे लागणार असल्याचे मुख्याध्यापकांनी सांगितले. राज्य सरकारने दहावीचा निकाल जाहीर करण्यासाठी अंतर्गत फॉर्म्युलाचा आधार घेतला आहे. या फॉर्म्युल्यामुळे काठावर उत्तीर्ण होणारे विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होतील. अनुत्तीर्ण होणारे विद्यार्थीदेखील व्यवस्थित गुण मिळवून उत्तीर्ण होणार आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांची लॉटरी लागली आहे. शाळेतील सर्व विद्यार्थी उत्तीर्ण करण्याच्या स्पर्धेत हुशार विद्यार्थ्यांना त्यांची शैक्षणिक गुणवत्ता दाखविण्याची संधीच मिळणार नाही - अविनाश ताकवले, माजी प्राचार्य, पूना नाइट स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/34XNoRZ
via IFTTT

Post a Comment

0 Comments