बारावी परीक्षेचे मूल्यमापन धोरण लवकरच

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता बारावी परीक्षा रद्द करण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. याबाबतचा शासन निर्णय शुक्रवारी प्रसिद्ध करण्यात आला. याचवेळी बारावी परीक्षेच्या मूल्यमापनाचे धोरण लवकरच जाहीर होणार असल्याचे शिक्षणमंत्र्यांनी सांगितले. बारावी परीक्षा रद्द केल्याची घोषणा करून आठ दिवस उलटून गेले तरी विद्यार्थ्यांना त्यांचे गुण कशाच्या आधारावर मिळणार याबाबतची स्पष्टता नाही. याचबरोबर पुढील प्रवेश परीक्षा आणि प्रवेश प्रक्रियेबाबतही स्पष्टता नाही यामुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ वाढतो आहे. दरम्यान, सुधारित मूल्यमापनाचे धोरण व निकालाची तारीख मंडळामार्फत लवकरच जाहीर करण्यात येईल. अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी शुक्रवारी दिली. विद्यार्थ्यांची आरोग्य सुरक्षितता आणि मानसिक स्वास्थ्य यांनाच प्राधान्य देण्याची आमची भूमिका आहे. बारावीच्या परीक्षेचे महत्त्व लक्षात घेता मूल्यमापनाचे एकसमान सूत्र निश्चित करावे, अशी मागणी केंद्राकडे करण्यात आली होती. सीबीएसई आणि आयसीएसईच्या परीक्षा रद्द केल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य मंडळाच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या आहेत. सर्व संबंधित घटकांशी केलेल्या चर्चेअंती सध्याचे वातावरण परीक्षेसाठी पोषक नसल्याने परीक्षा रद्द करून पर्यायी मूल्यमापनाच्या आधारे निकाल घोषित करावा, असे राज्य सरकारने केंद्राला यापूर्वीच सुचवले होते, असेही प्रा. गायकवाड यांनी सांगितले आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3cBuqEK
via IFTTT

Post a Comment

0 Comments