CBSE ने सांगितला १२ वी निकालाचा फॉर्म्युला; निकालाची तारीखही ठरली

CBSE 12th Plea In SC: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE)च्या वतीने महाधिवक्ता के. के. वेणुगोपाल यांनी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी बोर्डाचे मूल्यांकन निकष गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात सादर केले. मूल्यांकनासाठी ३०:३०:४० क्रायटेरिया लागू केला जाणार आहे. विद्यार्थ्यांचे दहावी, अकरावी आणि बारावीतले गुण बारावीच्या निकालासाठी विचारात घेतले जाणार आहेत. यानुसार निकाल कसा लावण्यात येईल, हेही वेणुगोपाल यांनी कळवले. तसेच बारावीचा निकाल ३१ जुलै २०२१ पर्यंत जाहीर केला जाईल, अशी माहितीही कोर्टाला दिली. केंद्र सरकारच्या वतीने अॅटर्नी जनरल के.के. वेणुगोपाल यांनी सर्वोच्च न्यायालात खंडपीठासमोर बोर्डाच्या दहावी, अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यांकन पद्धतीचे निकष सादर केले. यानुसार, विद्यार्थ्याचे मूल्यांकन करण्यासाठी त्याचे दहावी, अकरावी आणि बारावीतील बेस्ट तीन विषयांचे गुण ग्राह्य धरले जाणार आहेत. दहावीच्या गुणांसाठी ३० टक्के वेटेज, अकरावीच्या गुणांसाठी ३० टक्के वेटेज तर बारावीच्या गुणांसाठी ४० टक्के वेटेज दिले जाणार आहे. यासाठी टर्म परीक्षांच्या पाच पैकी तीन विषयांचे गुण विचारात घेतले जातील. बारावीच्या मूल्यमापनासाठी युनिट, टर्म आणि प्रात्यक्षिक परीक्षांचे गुण ग्राह्य धरले जाणार आहेत. निकाल तयार करण्यासाठी प्रत्येक शाळेत निकाल समिती स्थापन करण्यात येईल. कोणत्याही विद्यार्थ्याला अनावश्यक वाढीव गुण मिळणार नाहीत, याची जबाबदारी या समितीवर असेल, असे वेणुगोपाळ यांनी कोर्टाला सांगितले. न्या. ए.एम. खानविलकर आणि दिनेश महेश्वरी यांच्या खंडपीठाने गुरुवारी या याचिकांवर सुनावणी घेतली. ज्या ज्या राज्यांनी बारावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत, तेथील ज्या विद्यार्थ्यांना बिगरव्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घ्यायचा असेल तर त्याबाबत विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC)प्रवेशाच्या फॉर्म्युलासाठी समिती नेमावी, तसेच जेथे बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आलेल्या नाहीत, त्या राज्यांना तसे निर्देश द्यावेत, अशा मागण्या याचिकेत करण्यात आल्या होत्या. कशी असणार मार्किंग स्कीम पाहा - असा आहे सीबीएसई बारावी मूल्यांकन फॉर्म्युला - बारावी - यूनिट टेस्ट, मिड टर्म आणि प्री-बोर्ड परीक्षेतील कामगिरीच्या आधारे मिळणार गुण. या गुणांचे वेटेज ४० % असेल. अकरावी - अंतिम परीक्षेतील सर्व विषयांच्या लेखी परीक्षेतील गुणांच्या आधारे ग्राह्य धरणार ३० % वेटेज. दहावी - प्रमुख पाच विषयांपैकी तीन विषयांच्या लेखी परीक्षेतील कामगिरीच्या आधारे मिळणार गुण. हे तीन विषय म्हणजे विद्यार्थ्याला सर्वाधिक गुण मिळालेले बेस्ट तीन विषय असतील. याचे वेटेजही ३० % असेल. अॅड. अनुभा श्रीवास्तव सहाय आणि अन्य सात जणांनी विविध २३ राज्ये आणि दोन केंद्र शासित प्रदेश आणि तीन देशांमधील ४७ विद्यार्थ्यांच्या वतीने याचिका दाखल केल्या आहेत. बारावी बोर्ड परीक्षा रद्द करण्याची मागणी करणारी ही सर्वोच्च न्यायालयातील तिसरी याचिका आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3q40E0U
via IFTTT

Post a Comment

0 Comments