दहावी, बारावीचे निकाल रखडण्याची शक्यता

Harsh.Dudhe@timesgroup.com पुणे : करोनामुळे ३० एप्रिलपर्यंत वाढलेल्या लॉकडाउनचा फटका दहावी आणि बारावीच्या निकालाला बसण्याची शक्यता असून, यंदा निकाल रखडण्याचा अंदाज आहे. संचारबंदीमुळे शिक्षकांना दहावी-बारावीच्या परीक्षांच्या तपासलेल्या उत्तरपत्रिका मॉडरेटरपर्यंत पोहोचविणे, मॉडरेटरनी तपासलेल्या उत्तरपत्रिका चीफ मॉडरेटरपर्यंत पोहोचविणे अवघड झाले आहे. त्यातच अनेक उत्तरपत्रिका अजूनही तपासलेल्या नाहीत, अशी परिस्थिती आहे. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळात केवळ पाच टक्के कर्मचारी कार्यरत असल्याने निकाल तयार करण्याच्या कामाला फटका बसत आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात येणारी इयत्ता बारावीची परीक्षा १८ मार्चला संपली. दहावीचा भूगोलचा पेपर वगळता परीक्षा २१ मार्चला संपली. त्यानंतर २३ मार्चपासून राज्यात लॉकडाउन सुरू झाले. तोपर्यंत काही शिक्षकांनी विविध विषयांच्या उत्तरपत्रिका तपासणीसाठी त्यांच्याकडे घेतल्या होत्या. काहींनी अजूनही उत्तरपत्रिका ताब्यात घेतल्या नसून, त्या लॉकरमध्ये सुरक्षित आहेत. काही शिक्षकांनी मंडळाच्या निर्णयाप्रमाणे समयसूचकता दाखवून उत्तरपत्रिका तपासणीसाठी घरी नेल्या आणि त्या मुदतीत तपासून पूर्ण केल्या. घरी नेलेल्या उत्तरपत्रिका शिक्षकांना गुणांची तपासणी आणि इतर बाबींसाठी मॉडरेटरकडे जमा कराव्या लागतात. त्यानंतर मॉडरेटरकडून या उत्तरपत्रिका पुढच्या कार्यवाहीसाठी चीफ मॉडरेटरकडे सुपूर्द करण्यात येतात. मात्र, सध्याच्या लॉकडाउनच्या काळात ही साखळी तुटली आहे. त्यामुळे तपासलेल्या उत्तरपत्रिका शिक्षकांना मॉडरेटरपर्यंत, तर मॉडरेटर असणाऱ्यांना त्या उत्तरपत्रिका चीफ मॉडरेटरपर्यंत पोहोचवणे अशक्य झाल्याचे चित्र आहे. उत्तरपत्रिका तपासून झाल्या नाही, तर निकाल रखडण्याची शक्यता आहे. त्यामुळे निकाल उशिरा जाहीर होण्याची शक्यता आहे. या परिस्थितीत शिक्षक, मॉडरेटर आणि चीफ मॉडरेटर यांनी एकमेकांच्या अडचणी समजून घेऊन योग्य निर्णय घेण्याची आवश्यकता असल्याचे शिक्षक हितकारणी संघटनेचे अध्यक्ष प्रा. प्रकाश पवार यांनी सांगितले. .... शिक्षकांनी बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीचे काम पूर्ण केले आहे. लॉकडाउनमुळे काहींचे काम झाले नसण्याची शक्यता आहे. आता राज्यात १४ एप्रिलनंतर लॉकडाउन वाढल्याने, शिक्षकांना उत्तरपत्रिका तपासून, त्या मॉडरेटरपर्यंत नेण्यात अडचणी येत आहेत. त्याचवेळी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या विभागीय कार्यालयांतर्गत एकापेक्षा अनेक जिल्हे येतात. अशावेळी उत्तरपत्रिका एक जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात नेणेही शक्य नाही. त्यामुळे लॉकडाउन संपल्यानंतर यावर तोडगा काढणे उचित ठरणार आहे. सध्या सर्वांनी सामंजस्याची भूमिका घ्यावी. - प्रा. संतोष फाजगे, सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघ .... पाच टक्के कर्मचारी कार्यरत राज्य सरकारच्या निर्णयाप्रमाणे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या मुख्य कार्यालयासोबतच राज्यातील विभागीय कार्यालयांमध्ये पाच टक्के कर्मचारी कार्यरत आहेत. आगामी काळातही अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे कमी कर्मचाऱ्यांमुळे निकाल तयार करण्यासाठीच्या कामातही विलंब होण्याची शक्यता आहे. या परिस्थितीत राज्य मंडळाकडून विविध कार्यप्रणालीचा अभ्यास सुरू आहे. उत्तरपत्रिका ने-आण करण्यासाठी पोस्टाच्या मदतीसह अन्य पर्यायांचाही विचार सुरू आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2yYPPae
via IFTTT

Post a Comment

0 Comments