अकरावीच्या परीक्षेला 'खो'? अद्याप कोणतेही आदेश नाहीत

म. टा. प्रतिनिधी, नागपूर दहावी आणि बारावीच्या परीक्षांची सर्वत्र चर्चा सुरू असताना अकरावीच्या परीक्षांना यंदा 'खो' मिळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. शालेय शिक्षण विभागाने या परीक्षांबाबत कोणतेही आदेश काढले नसल्याने सलग दुसऱ्या वर्षातही या परीक्षा होणार नाहीत की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. करोनामुळे यंदा सर्वच वर्गांच्या परीक्षांसंदर्भात वेगवेगळे प्रश्न निर्माण झाले आहेत. ज्युनियर कॉलेजचे प्रथम वर्ष आणि बारावीपूर्वीचे विश्रांतीचे वर्ष समजले जाणारे अकरावीचे वर्ष सर्वाधिक दुर्लक्षित राहिले आहे. करोनाकाळात अकरावीचे वर्ग ऑनलाइन स्वरूपात झाले होते. जानेवारी आणि फेब्रुवारीचा अपवाद वगळता या वर्गाचे विद्यार्थी ज्युनियर कॉलेजमध्ये आलेलेच नाहीत. अकरावीची परीक्षा केवळ औपचारिकता समजली जात असली तरी ती घेणे सर्व ज्युनियर कॉलेजांना बंधनकारक आहे. मात्र, करोनास्थितीमध्ये ही परीक्षा कशी घेणार, याबाबत पुन्हा एकदा साशंकता निर्माण झाली आहे. मागीलवर्षी मार्च महिन्यात करोना संसर्ग वाढू लागला होता. त्यावेळेपर्यंत, अकरावीच्या वर्षातील तीन परीक्षा पूर्ण झाल्या होत्या. त्या परीक्षांच्या आधारे विद्यार्थ्यांना सरासरी गुण देऊन उत्तीर्ण करण्यात आले होते. मात्र, यंदाची स्थिती मागील वर्षापेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. करोनामुळे कॉलेजच्या कोणत्याच परीक्षा होऊ शकलेल्या नाहीत. त्यामुळे, सरासरी गुण देण्याचा पर्याय यंदा अवलंबिता येणार नाही. त्यामुळे, ऑनलाइन परीक्षा घेणे, व्हॉट्सअॅपवर पेपर पाठवून विद्यार्थ्यांकडून सोडवून घेणे असे पर्याय यंदा वापरले जाण्याची शक्यता असल्याचे ज्युनियर कॉलेजांमधील प्राध्यापकांनी सांगितले. आदेशही नाहीत... करोनामुळे यंदा अकरावीचे प्रवेश उशिरा झाले. त्यामुळे, ऑनलाइन वर्गही उशिराने सुरू झाले होते. मिळालेल्या वेळात अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे आव्हान कॉलेजेससमोर होते. आता, अकरावीच्या परीक्षा घेण्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. शालेय शिक्षण विभागाकडूनही अकरावीसंदर्भात कोणतेही आदेश न आल्याने ज्युनियर कॉलेजे आणि विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2MQlhi6
via IFTTT

Post a Comment

0 Comments