दुसऱ्या शाळेत प्रवेश घेताना अडचण येतेय ? शिक्षणमंत्र्यांनी दिली माहिती

Right to Education:शाळा बदलायची असल्यास विद्यार्थ्यांना दाखला मिळण्यास उशीर होतो, बऱ्याचदा आधीच्या शाळेतून दाखला दिला जात नाही. अशा अनेक अडचणींना विद्यार्थी आणि पालक सामोरे जात असतात. विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये याची काळजी मुख्याध्यापकांना घ्यावी लागणार आहे. वर्षा गायकवाड यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहिल्यास संबंधित मुख्याध्यापक आणि शाळाप्रमुख यांना जबाबदार धरले जाणार आहे. तसेच त्यांच्याविरुद्ध नियम आणि कायद्यातील तरतुदीनुसार योग्य ती कारवाई केली जाणार असल्याचे शिक्षणमंत्र्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना शिकण्याचा तसेच एका शाळेतून दुसऱ्या शाळेत प्रवेश घेण्याचा अधिकार आहे. सध्याच्या असामान्य परिस्थितीमध्ये, आर्थिक कारणांमुळे शालेय शुल्क भरू न शकलेल्या अनेक विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा दाखला दिला जात नाही. शाळा सोडल्याचा दाखला नसल्यामुळे विद्यार्थ्यांना इतर शासकीय व अनुदानित शाळांमध्ये प्रवेश नाकारल्याच्या अनेक तक्रारी शिक्षण विभागापर्यंत आल्या आहेत. फक्त शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र नसल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारणे हे अन्यायकारक तसेच शिक्षण हक्क कायद्याची पायमल्ली करणारे आहे. विद्यार्थ्यांना त्यांचे शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र उशिरा दिले जात असेल व त्यामुळे प्रवेश नाकारला असेल अशा विद्यार्थ्यांना नवीन शाळांनी शिक्षण हक्क कायद्यानुसार वयानुरूप प्रवेश द्यावा अशा सुचना शिक्षणमंत्र्यांनी दिल्या आहेत. यासाठी विद्यार्थ्याचे जन्माचे प्रमाणपत्र पुरावा म्हणून ग्राह्य मानले जाणार आहे. इयत्ता नववी आणि दहावीच्या वर्गात प्रवेशाची मागणी करत असलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र नाही म्हणून प्रवेश नाकारू नये असे निर्देश देण्यात आले आहेत. त्यांना तात्पुरता प्रवेश देऊन माध्यमिक शाळेतील तरतुदीनुसार पुढील कार्यवाही करावी असे आदेश शालेय शिक्षणमंत्र्यांनी दिले आहेत. यामुळे विद्यार्थी आणि पालकांना दिलासा मिळाला आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2TCCbnq
via IFTTT

Post a Comment

0 Comments