शाळांची घंटा सोमवारपासून वाजणार; पालकांचे संमतीपत्र बंधनकारक

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई मुंबई महापालिका आयुक्तांनी () करोनाच्या नियमांचे पालन करत शहरातील इयत्ता आठवी ते बारावीच्या सर्व मंडळाच्या सर्व शाळा ४ ऑक्टोबरपासून सुरू करण्यास (maharashtra ) बुधवारी परवानगी दिली. त्यामुळे आता तब्बल दीड वर्षांनंतर मुंबईतही ४ ऑक्टोबरला शाळेची घंटा वाजणार आहे. मुलांना शाळेत पाठवण्यासाठी पालकांची संमती बंधनकारक असणार आहे. राज्यातील ग्रामीण भागातील इयत्ता पाचवी ते आठवी आणि शहरी भागातील इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग ४ ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने नुकताच जाहीर केला. मात्र, मुंबईतील शाळांसंदर्भातील निर्णय पालिका घेणार होती. त्यानुसार बुधवारी पालिका आयुक्तांनी शहरातील सर्व माध्यमांचे इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यास परवानगी दिली. मात्र, शाळा सुरू करताना राज्य सरकारच्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे सर्व शाळांना बंधनकारक असणार आहे. आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यापूर्वी शाळा प्रशासनाने आवश्यकतेनुसार शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना उपस्थित ठेवावे. शाळा सुरू करण्यापूर्वी व शाळा सुरू झाल्यानंतर आरोग्य, स्वच्छता व इतर सुरक्षाविषयक उपाययोजनांबाबतच्या मार्गदर्शनाचे शाळांना अचूक पालन करायचे आहे. पालिका क्षेत्रातील मनपा शाळांचे सहाय्यक आयुक्त यांच्या सहाय्याने सोडियम हायपोक्लोराइड सोल्युशनने निर्जंतुकीकरण करून घ्यावे, तर अन्य व्यवस्थापनांच्या शाळांनी आपल्या स्तरावर वर्गांचे निर्जंतुकीकरण करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत. मुंबईतील शाळा ४ ऑक्टोबरपासून ऑफलाइन सुरू होणार असल्या तरी ज्या विद्यार्थ्यांना शाळेत येणे शक्य होणार नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन शिक्षण सुरू ठेवण्यात येणार असल्याचे पालिकेच्या शिक्षण विभागाकडून यापूर्वीच स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, शाळा सुरू करण्यासाठी शिक्षकांना अन्य कार्यातून मुक्त केले जाणार आहे. करोना काळामध्ये अनेक शिक्षकांना करोना ड्युटी लावण्यात आली आहे. यामध्ये शिक्षकांना कोविड सेंटर, रेल्वे स्थानकांवर कोविड लसीकरण प्रमाणपत्र पडताळणी करण्याची जबाबदारी सोपवली आहे. तसेच निवडणूक विषयक कामासाठी शिक्षकांची नेमणूक केली आहे. त्यामुळे या शिक्षकांना कार्यमुक्त करण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले आहेत. ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या तिकिटाचे काय? ज्युनिअर कॉलेजांचे वर्ग सुरू होत असले, तरी बहुतांश विद्यार्थी हे अकरावी आणि बारावीसाठी लोकल प्रवास करून ज्युनिअर कॉलेज गाठतात. आता कॉलेज सुरू झाले तर या विद्यार्थ्यांना रेल्वेने प्रवास करण्यास मुभा दिली जाणार का असा प्रश्न विचारला जात आहे. हे विद्यार्थी १८ वर्षांपेक्षा कमी वयाचे असल्याने त्यांचे लसीकरण झालेले नाही आणि लसीकरणाशिवाय लोकल प्रवास शक्य नाही. यामुळे या विद्यार्थ्यांसाठी लोकलमुभा द्यावी, अशी मागणीही होत आहे. अन्यथा या विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणावरच अवलंबून राहावे लागणार आहे. शाळेतील केंद्र इतरत्र हलवणार करोना काळात नागरिकांना विलगीकरणाची सुविधा उपलब्ध व्हावी आणि त्यांचे लसीकरण व्हावे यासाठी महापालिकेच्या शाळांमध्ये लसीकरण व विलगीकरण कक्ष उभारण्यात आले होते. मात्र, शाळा सुरू करण्यासाठी इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग असलेल्या शाळांमधील कोविड लसीकरण केंद्र व कोविड विलगीकरण कक्ष सहाय्यक आयुक्तांच्या सहाय्याने अन्य ठिकाणी स्थलांतरित करून वापरण्यायोग्य सुस्थितीत करावे. पालिकेच्या शाळा व अन्य व्यवस्थापनाच्या शाळांनी आपले वर्ग नजीकच्या महापालिका किंवा खासगी आरोग्य केंद्राशी संलग्न करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3CSWNsS
via IFTTT

Post a Comment

0 Comments