School Reopening Update: ओमायक्रॉनमुळे धास्तावल्या पालिका; मुंबईत शाळा १५ डिसेंबरपासून

School Reopen: ओमायक्रॉनच्या () धास्तीने मुंबई महानगरपालिकेने (BMC) शाळा सुरू करण्याबाबत मोठा निर्णय लांबणीवर टाकला आहे. मुंबईतील इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा १ डिसेंबर सुरू होणार होत्या. पण आता मुंबईतील शाळा (MumbaiSchool) १५ दिवसांनी म्हणजे १५ डिसेंबरपासून उघडण्यात येतील असा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल आणि शालेय शिक्षणाशी संबंधित अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. कोरोना विषाणूच्या (Covid 19) नवीन ओमायक्रॉन (Omicron) प्रकाराचे संभाव्य धोके लक्षात घेऊन बीएमसीने हा निर्णय घेतला आहे. मुंबईप्रमाणेच पुण्यातही (Pune Municipal Corporation) आता १५ डिसेंबरपासून पहिलीच्या वर्गापासून शाळा सुरू होणार आहेत. यासंदर्भात आज महापौर मुरलीधर मोहोळ आणि पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्यात बैठक झाली. १५ डिसेंबरनंतर पुण्यात शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे या बैठकीत ठरले. पुणे मनपा हद्दीतील इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळा १५ डिसेंबरपर्यंत बंदच राहणार आहेत. पुणे मनपा हद्दीतील इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळा १५ डिसेंबरपर्यंत बंदच ठेवण्याचा निर्णय आपण घेतला असून १५ डिसेंबरला एकूणच आढावा घेऊन पुढील निर्णय जाहीर केला जाईल अशी प्रतिक्रिया महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली. यानंतर नाशिक महापालिकेनेही उद्यापासून शाळा सुरू करण्याचा निर्णय पुढे ढकलला आहे. नाशिकमध्ये शाळा सुरू करण्याचा निर्णय १० डिसेंबरनंतर घेतला जाणार आहे. नाशिकच्या महापौरांनी ही माहिती दिली आहे. मुंबईतील शाळा आणि विद्यार्थी संख्या मुंबई पालिका क्षेत्रातील शाळा सुरु करण्याबाबतचा निर्णय घेण्याचे अधिकार महापालिका आयुक्तांना आहे. मुंबई पालिका क्षेत्रात ८ वी ते १२ वीच्या एकूण २६४२ शाळा असून यामध्ये ८ लाख विद्यार्थी आहेत. तसेच पहिली ते सातवीच्या ३४२० शाळा असून यामध्ये साधारण दहा लाख विद्यार्थी आहेत. महानगरपालिकेच्या एकूण ११५९ शाळा असून ४५० इमारती आहेत. यामध्ये एकूण २ लाख ९२ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मुंबई पालिकेअंतर्गत येणाऱ्या सर्व मॅनेजमेंट आणि सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये एकूण ६० हजार कर्मचारी संख्या आहे. यातही ८२ टक्के कर्मचाऱ्यांचे लसीकरण झाले आहे. मार्गदर्शक सूचना शाळा सुरू करण्यापूर्वी आरोग्य, स्वच्छता आणि इतर सुरक्षाविषयक उपाययोजनांना प्राधान्य देण्यात आले आहे. या मार्गदर्शक सूचनांनुसार संबंधित शाळेतील शिक्षक/ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कोविड लसीकरण (दोन लसी) झालेल्यांनाच शाळा/ कार्यालयामध्ये प्रवेश देण्यात यावा. सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कोविड-१९ साठीची ४८ तासापूर्वीची आरटीपीसीआर चाचणी करावी. विद्यार्थ्यांचे नाक व तोंड मास्कने पूर्णत: झाकलेले असले पाहिजे याबाबत विद्यार्थ्यांना सातत्याने सांगावे. शाळेतील परिपाठ, स्नेह संमेलन व इतर तत्सम कार्यक्रम ज्यामुळे अधिक गर्दी होऊ शकते अथवा स्पर्श होईल अशा कार्यक्रमांच्या आयोजनावर कडक निर्बंध असेल. शिक्षक-पालक बैठका देखील शक्यतो ऑनलाईन घ्याव्यात. शाळेत हात धुण्यासाठी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. वर्गामध्ये एका बाकावर एक विद्यार्थी याप्रमाणे बैठक व्यवस्था असावी. विद्यार्थ्यांनी शाळेत उपस्थित राहण्यापूर्वी त्यांच्या पालकांची संमती आवश्यक असणार आहे. शाळा सुरू झाल्यानंतर करावयाच्या उपाययोजनांबाबत देखील विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यानुसार शाळेत व परिसरात स्वच्छता व आरोग्यदायी परिस्थिती राखावी. सर्व शाळा आरोग्य केंद्राशी संलग्न कराव्यात. यासाठी इच्छुक डॉक्टर पालकांची मदत घेण्यात यावी. जास्त विद्यार्थी असलेल्या शाळा दरदिवशी दोन सत्रांमध्ये भरविण्यात याव्यात. विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी यांची दररोज थर्मल स्क्रिनिंग चाचणी घेण्यात यावी. सद्यस्थितीत पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचे कोणत्याही प्रकारचे खेळ घेण्यात येऊ नयेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी वाहनचालक व मदतनीस यांचे 100 टक्के लसीकरण झालेले असावे. उपरोक्त सूचनांव्यतिरिक्त स्थानिक परिस्थितीनुसार शाळांनी आवश्यक मार्गदर्शक तत्वे, सूचना निश्चित करावीत व प्रभावी अंमलबजावणी करावी. तसेच शासनाने कोविड-१९ संदर्भात वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे देखील पालन करण्यात यावे, असेही या मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद करण्यात आले आहे. सविस्तर माहितीसाठी शासन परिपत्रक पाहावे, असे आवाहन शालेय शिक्षण विभागामार्फत करण्यात आले आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3FUdeqg
via IFTTT

Post a Comment

0 Comments