SSC Exam 2022: दहावीच्या परीक्षेला आजपासून सुरूवात; 'या' निर्देशांचे पालन करावे लागणार

SSC Exams 2022: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education, MSBSHSE) मंगळवार, १५ मार्चपासून इयत्ता दहावीची परीक्षा () सुरु होणार आहे. लाखो उमेदवारांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली असून याचे प्रवेशपत्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाईट mahahsscboard.in वर आधीच जारी करण्यात आले आहे. परीक्षेला बसण्यासाठी महाराष्ट्र बोर्डाकडून (Maharashtra Board) मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. सर्व विद्यार्थ्यांनी या निर्देशांचे पालन करणे आवश्यक असणार आहे. दहावीची परीक्षा २०२२ ही १५ मार्च ते ४ एप्रिल या कालावधीत घेतली जाणार असून. परीक्षा दोन शिफ्टमध्ये होणार आहेत. सकाळच्या पहिल्या शिफ्टमध्ये सकाळी १०.३० वाजल्यापासून बहुतांश परीक्षा सुरू होतील. उर्वरित पेपर दुसऱ्या शिफ्टमध्ये दुपारी ३ वाजल्यापासून घेण्यात येतील. परीक्षेदरम्यान करोना प्रतिबंध निर्देशांचे पालन केले जाणार आहे. या परीक्षेसाठी एकूण १६ लाख ३९ हजार १७२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे. यामध्ये ८ लाख ८९ हजार ५८४ विद्यार्थी तर ७ लाख ४९ हजार ४८७ विद्यार्थिनी परीक्षा देणार आहेत. एकूण २२ हजार ९११ माध्यमिक शाळांमधून विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. संपूर्ण राज्यातील ५०५० मुख्य केंद्र आणि १६ हजार ३३४ उपकेंद्र मिळून २१ हजार ३८४ ठिकाणी परीक्षा होणार आहे. परीक्षेतून नैराश्य आलेल्या विद्यार्थ्यांना त्यातून बाहेर काढण्यासाठी १० काऊन्सेलर्सची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच विभागीय स्तरावर एक किंवा दोन काऊन्सेलरची नियुक्ती करण्यात आली आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांना सवलती मिळविण्यासाठी संबंधित विभागीय मंडळाची पुर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे. भरारी पथके परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी संपूर्ण राज्यात भरारी पथकांची नजर परीक्षार्थींवर असणार आहे. या व्यतिरिक्त प्रत्येक जिल्ह्यात दक्षता समिती स्थापन करण्यात आली आहे. विशेष महिला भरारी पथक आणि विशेष अधिकाऱ्यांना परीक्षाकेंद्रांना भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा प्रचलित पद्धतीने घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांच्या सोयीच्या दृष्टीने शाळा तेथे केंद्र/ उपकेंद्र यापद्धतीने नियोजन करण्यात आले असून इयत्ता बारावीसाठी परीक्षा केंद्रांची/ उपकेंद्रांची संख्या ९६१३ तर इयत्ता दहावीसाठी परीक्षा केंद्रांची/ उपकेंद्रांची संख्या २१,३४९ इतकी असणार आहे. विद्यार्थ्यांची सोय लक्षात घेऊन १५ किंवा त्यापेक्षा जास्त विद्यार्थी संख्या असल्यास शाळा तेथे परीक्षा केंद्र अथवा उपकेंद्र तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावर्षी ७५ टक्के अभ्यासक्रमावर आधारीत लेखी परीक्षेचे नियोजन करण्यात आले असून शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांमधीलच अंतर्गत व बहिस्त परीक्षकांच्या नियुक्त्या करण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांचा लिखाणाचा सराव कमी झाला असल्याने लेखी परीक्षेच्या ७० ते १०० गुणांच्या पेपरसाठी ३० मिनिटे तर, लेखी परीक्षेच्या ४० ते ६० गुणांच्या पेपरसाठी १५ मिनिटे जादा वेळ देण्यात येणार आहे. इयत्ता दहावीसाठी प्रात्यक्षिक प्रयोग/ गृहपाठावर आधारित मूल्यमापन करण्यात येत आहे. करोना प्रतिबंध निर्देश सर्वप्रथम विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर करोना मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे अनिवार्य आहे. याशिवाय प्रवेशपत्रासोबत फेस मास्क, हँड सॅनिटायझर सोबत ठेवणे गरजेचे आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर रिपोर्टिंग वेळेच्या ३० मिनिटे आधी पोहोचणे आवश्यक आहे. परीक्षा केंद्रात प्रवेश करताना विद्यार्थ्यांची तपासणी केली जाईल. विद्यार्थ्यांना परीक्षा हॉलमध्ये कोणत्याही प्रकारचे इलेक्ट्रॉनिक उपकरण घेऊन जाण्यास परवानगी नाही. प्रश्नांची उत्तरे देण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिकेवर दिलेल्या सर्व सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/kz5uqQA
via IFTTT

Post a Comment

0 Comments