FYJC Online प्रवेशासाठी मोबाईल अॅप

म. टा. प्रतिनिधी, पुणे / मुंबई इयत्ता अकरावीची प्रवेशप्रक्रिया अधिक सोपी व्हावी व विद्यार्थ्यांना घरबसल्या त्यात सहभागी होता यावे, यासाठी खास मोबाइल अॅप उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या मोबाइलवरच अकरावी प्रवेशासंदर्भातील प्रक्रिया पार पाडता येणे शक्य होणार आहे. शिक्षण संचालनालयातर्फे पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, अमरावती महापालिका क्षेत्रांमध्ये अकरावीसाठीची केंद्रीय प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन माध्यमाने राबविण्यात येत आहे. या प्रक्रियेतील पहिला भाग भरण्यास सुरुवात झाली असून, त्यासाठी एक ऑगस्ट ही अंतिम मुदत आहे. ही मुदत संपण्याच्या आत हे मोबाइल अॅप उपलब्ध होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना अकरावीच्या प्रवेशप्रक्रियेत अडचण येऊ नये, यासाठी माध्यमिक शिक्षण विभागाने दोन वर्षांपूर्वीच कॉल सेंटर सुरू केले होते. त्या माध्यमातून विद्यार्थी-पालकांच्या समस्या सोडवल्या जातात. यंदादेखील हे कॉल सेंटर कार्यान्वित केले गेले आहे. सध्या या कॉल सेंटरचे काम दोन कर्मचारी सांभाळत आहेत. या कॉल सेंटरद्वारे महाविद्यालयांना येणाऱ्या समस्याही सोडविण्यात येत आहेत. लवकरच या कॉल सेंटरमधील कर्मचाऱ्यांची संख्याही वाढविण्यात येणार आहे. त्याचबरोबर यंदा नव्याने विकसित करण्यात येत असलेल्या मोबाइल अॅपची चाचणी सध्या सुरू आहे. लवकरच हे अॅपही विद्यार्थ्यांना उपलब्ध होईल. मोबाइल अॅपमुळे विद्यार्थ्यांसाठी ही प्रवेशप्रक्रिया सोपी होईल. अनेक विद्यार्थी सायबर कॅफेच्या माध्यमातून या प्रक्रियेत सहभागी होतात. सध्याच्या करोना संसर्गाच्या काळात विद्यार्थ्यांना घराबाहेर पडावे लागू नये, यासाठी हे अॅप उपयुक्त ठरेल, असे सूत्रांनी सांगितले. 'अकरावीची प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे. यंदा या प्रक्रियेत मोबाइल अॅपचाही समावेश केला जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थी व पालकांसाठी ही प्रक्रिया अधिक सोयीची होईल. लवकरात लवकर हे अॅप्लिकेशन कार्यान्वित केले जाईल,' असे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक दिनकर पाटील यांनी सांगितले. १ ऑगस्टपासून प्रत्यक्ष नोंदणी विद्यार्थ्यांना अर्ज करणे सुलभ व्हावे या उद्देशाने अॅप सुरू करण्यात येणार आहे. या अॅपमध्ये विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यापासून विविध सुविधा एका क्लिकवर असतील. सध्या विद्यार्थ्यांना लॉगइन आयडी आणि पासवर्ड तयार करण्याची सुविधा उपलब्ध आहे. तर १ ऑगस्टपासून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष नोंदणी करता येईल. यात अर्जाचा पहिला भाग भरता येईल. राज्य शिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यांना दहावी परीक्षेचे आसन क्रमांक नमूद करायचा आहे. त्यानंतर त्यांचा राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडे असलेला सर्व तपशील मिळेल. हा तपशील तपासून विद्यार्थ्यांना शिक्कामोर्तब करायचे आहे. विद्यार्थ्यांनी आवश्यक ती प्रमाणपत्रे अपलोड करावीत, असे आवाहनही शिक्षण विभागातर्फे करण्यात येणार आहे. सर्व प्रवेश हे ऑनलाइन पद्धतीने होणार असून, एकदा ऑनलाइन गुणवत्ता यादी जाहीर झाल्यावर शुल्कही ऑनलाइनच भरायचे आहे. यंदा कागदपत्रांची छाननही ऑनलाइन होणार असून, विद्यार्थ्यांना तात्पुरता प्रवेश दिला जाईल. प्रत्यक्ष शिक्षण संस्था सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना कागदपत्रे कॉलेजात जमा करावी लागतील. यानंतर प्रवेश निश्चिती होईल. यंदा मुंबई महानगर परिक्षेत्रात एकूण ८३६ ज्युनिअर कॉलेज असून, ३ लाख १९ हजार ४०६ जागा आहेत.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2BzCNBx
via IFTTT

Post a Comment

0 Comments