शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवत्ता वाढवण्याकरिता शिक्षण विभागाचे महत्वाचे पाऊल, जाणून घ्या

पिंपरी : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये पिंपरी-चिंचवड शहराचा पाचवी आणि आठवीचा निकाल तुलनेने घटला. त्यामुळे शिक्षण विभागाने या दृष्टीने कंबर कसली असून मिशन शिष्यवृत्ती कार्यक्रम शिक्षण विभागाने जाहीर करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका शाळांचा इयत्ता पाचवीचा निकाल ५.१ टक्के, तर आठवीचा निकाल ६.६ टक्के इतका लागला आहे. हा निकाल समाधानकारक नसल्याने विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवत्ता वाढवण्याकरिता ‘मिशन शिष्यवृत्ती’ कार्यक्रम शिक्षण विभागाने हाती घेतला असल्याचे अशी माहिती प्रभारी प्रशासन अधिकारी स्मिता गौड यांनी दिली. यावर्षी इयत्ता पाचवीच्या एक हजार ३०७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी एक हजार ८९ विद्यार्थी उपस्थित होते. यामध्ये फक्त ५६ विद्यार्थी पात्र ठरले. इयत्ता आठवीच्या ५१५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ४०५ विद्यार्थी उपस्थित होते. त्यापैकी फक्त २७ विद्यार्थी पात्र ठरले. ही आकडेवारी समाधानकारक नसल्याने प्रभारी प्रशासन अधिकारी स्मिता गौड यांनी मुख्याध्यापकांची बैठक घेतली. शिक्षक प्रशिक्षणास सुरुवात मिशन शिष्यवृत्ती कार्यक्रम जाहीर करून मुख्याध्यापकांना सूचना देण्यात आल्या. यामध्ये महापालिकेच्या सर्व प्राथमिक आणि माध्यमिक शाळांतील प्रत्येक विद्यार्थ्यांला शिष्यवृत्ती परीक्षेस प्रविष्ट करावे; तसेच एकूण विद्यार्थ्यांपैकी ५० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण होतील यासाठी प्रयत्न करावेत; १० टक्के विद्यार्थी गुणवत्ता यादीत येण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यासाठी शिक्षकांचे प्रशिक्षण सोमवार (२० डिसेंबर) पासून सुरू करण्यात आले आहे. मिशन शिष्यवृत्ती या कार्यक्रमांतर्गत महापालिका शाळातील पाचवी आणि आठवी इयत्तेच्या प्रत्येक विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती परीक्षेसाठी तयार करण्यात येईल. तसेच यासाठी शिक्षकांचे चार दिवसीय ऑनलाईन प्रशिक्षण सुरु करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्यातील शिष्यवृत्तीत तज्ज्ञ असलेली ८ मंडळी यासाठी शिक्षकांना प्रशिक्षण देत आहेत. महापालिकेचे ३५० हून अधिक मुख्याध्यापक, शिक्षक याचे प्रशिक्षण घेत आहेत. तसेच विद्यार्थ्यांचा अभ्यास ३१ जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. फेब्रुवारी महिन्यात विद्यार्थ्य़ांच्या ३ सराव चाचण्या महापालिकेच्या वतीने घेण्यात येतील. सध्या २०२२ च्या शिष्यवृत्ती परीक्षेचे अर्ज भरण्यास सुरुवात झालेली आहे. तर २० फेब्रुवारी २०२२ रोजी घेण्यात येणार आहे. शिष्यवृत्ती परीक्षेचा फॉर्म भरण्याची ३१ डिसेंबर २०२१ ही अंतिम तारीख आहे. शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल पाहून याबाबत थोडी उदासीनता असल्याचे पाहायला मिळाले. विद्यार्थ्यांची अभ्यासातील गुणवत्ता तपासणे आणि विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षेची गोडी निर्माण करणे यासाठी शिष्यवृत्ती परीक्षा हा उत्तम पर्याय आहे. त्यामुळे सर्वच विद्यार्थ्यांनी परीक्षा द्यावी हा यामागचा हेतू आहे. या उद्देशाने मिशन शिष्यवृत्ती कार्यक्रम सुरु केल्याचे प्रभारी प्रशासन अधिकारी स्मिता गौड यांनी सांगितले.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3EfvPfp
via IFTTT

Post a Comment

0 Comments