२ मार्चपासून मुंबईतील शाळा १०० टक्के उपस्थितीत आणि पूर्णवेळ भरणार

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई गेल्या दोन वर्षांत कधी ऑनलाइन-कधी ऑफलाइन भरणारे वर्ग आता पूर्णवेळ १०० टक्के क्षमतेने ( Reopening in Mumbai) शाळांच्या बाकांवर होतील. मुंबईमध्ये करोनासाथ नियंत्रणात आल्याने येत्या २ मार्चपासून शहरातील सर्व मंडळांच्या शाळा, ज्युनिअर कॉलेज पूर्ण वेळ आणि क्षमतेने सुरू होणार आहेत. त्यामुळे आतापर्यंत ५० टक्के प्रत्यक्ष आणि ५० टक्के ऑनलाइन चालणाऱ्या सर्व शाळा प्रत्यक्ष भरतील. मुंबई पालिका आयुक्त इक्बाल सिंह यांनी शुक्रवारी याबाबत आदेश जारी केले आहेत. मार्चपासून शाळा सुरू करताना करोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोर पालन करणे अनिवार्य असल्याचे पालिका आयुक्तांनी स्पष्ट केले. मुंबईत करोना संसर्गामुळे शाळा नियमितपणे आणि प्रत्यक्ष सुरू होण्यात वारंवार व्यत्यय येत गेले. अखेरीस करोना नियंत्रणात आल्यानंतर मुंबईतील पालिकेसह अन्य सर्व मंडळाच्या पूर्व प्राथमिक ते बारावीपर्यंत शाळा, ज्युनिअर कॉलेजे मार्चपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यात विशेष, दिव्यांग विद्यार्थ्यांचे वर्ग, मैदानी खेळ, शाळेच्या विविध उपक्रमांसह पूर्णवेळ आणि पूर्ण क्षमतेने शाळा सुरू होणार आहेत. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी शुक्रवारी आयुक्त चहल यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यावेळी, करोना नियंत्रणात आला तरीही शाळा सुरू करताना सर्वतोपरी काळजी घेणे, नियम पाळणे आवश्यक असल्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे, सहआयुक्त अजित कुंभार, चंद्रशेखर चौरे आदी उपस्थित होते. करोना लसीकरणासाठी पात्र असलेल्या विद्यार्थ्यांना मात्रा देण्यासाठी पालकांच्या संमतीनुसार निर्णय घेण्यात येईल. पालिकेचा शिक्षण विभाग आणि डॉक्टरांच्या मदतीने शाळांच्या आवारात १५ वर्षांवरील विद्यार्थ्यांसाठी लसीकरण शिबिरे आयोजित करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येणार आहे. काय आहेत नियम? - विद्यार्थी शाळेत प्रवेश करताना त्यांचे तापमान तपासले जाईल. - शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची १०० टक्के उपस्थिती आवश्यक. - शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे १०० टक्के लसीकरण अनिर्वाय. - करोनापूर्व वेळापत्रकानुसार शाळांच्या नियमित वर्गांच्या तासांमध्ये मैदानी खेळ, शालेय कवायती, सहशालेय शैक्षणिक उपक्रम घेतले जावेत. - वर्ग, स्कूलबस/स्कूल व्हॅनसह शालेय परिसरात मास्क वापरणे बंधनकारक. परंतु, मैदानी खेळ/कवायतींसाठी मास्क बंधनकारक नाही. - शाळांमध्ये पूर्वीप्रमाणे मधली सुट्टी देण्यात येणार आहे. - तसेच मधल्या सुट्टीत विद्यार्थ्यांना पूर्वीप्रमाणे आहार घेण्यास अनुमती. - करोनासदृश लक्षणे असल्यास मुलांना शाळेत पाठवू नये. - विद्यार्थ्यांना पूर्वीप्रमाणेच शाळेत ये-जा करण्यासाठी बेस्ट सेवा, खासगी बसच्या प्रवासास अनुमती.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/nmo29bk
via IFTTT

Post a Comment

0 Comments