महाराष्ट्रात दिल्लीचे शिक्षण मॉडेल राबवणार, उच्च शिक्षण राज्यमंत्र्यांची माहिती

Delhi Model: महाराष्ट्राचे उच्च शिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिल्लीतील दोन सरकारी शाळांना भेट देऊन तिथल्या शिक्षणाचे मॉडेल समजून घेतले. पश्चिम विनोद नगरमधील सर्वोदय बाल विद्यालय आणि खिचरीपूर येथील स्कूल ऑफ एक्सलन्स या शाळांना त्यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी दिल्लीच्या शैक्षणिक मॉडेलचे कौतुक केले. दिल्लीने शैक्षणिक क्षेत्रात चांगले काम केले आहे. महाराष्ट्रातही दिल्लीसारखे मॉडेल राबविणार असल्याचे प्राजक्त तनपुरे यावेळी म्हणाले. 'दिल्ली सरकार महाराष्ट्र सरकारला शिक्षण व्यवस्था सुधारण्यासाठी मदत करण्यास तयार असल्याचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यावेळी म्हणाले. दिल्लीच्या शिक्षण मॉडेलची भारतभर चर्चा होत आहे. मी हे समजून घेण्यासाठी दिल्लीला गेलो होतो. याबद्दल आम्ही खूप ऐकले होते. दिल्लीच्या सरकारी शाळांमध्ये मी जे पाहिले ते माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त होते असे यावेळी महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे म्हणाले. दिल्लीतील शिक्षण व्यवस्था पाहिल्यास मोठ्या प्रमाणात सरकारी शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांना जागतिक दर्जाचे शिक्षण कसे देता येईल, हे कळू शकते. सर्व राज्यांनी दिल्लीच्या शैक्षणिक मॉडेलपासून धडा घेऊन ते स्वीकारण्याची गरज असल्याचे तनपुरे यांनी सांगितले. दिल्लीच्या सरकारी शाळांतील विद्यार्थ्यांकडे व्यक्त होण्याचे चांगले कौशल्य आहे. त्यांची स्वतःची दृष्टी आहे. सरकारी शाळांमध्ये मुलांना शिक्षण देण्यासाठी खूप मेहनत घेतली जात असल्याचेही ते म्हणाले. तनपुरे यांनी त्यांच्या भेटीदरम्यान शाळेची प्रयोगशाळा, लायब्ररीला भेट दिली आणि मुलांशी संवाद साधला असे दिल्ली सरकारच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. दिल्लीतील शाळा १ नोव्हेंबरपासून सुरु राष्ट्रीय राजधानीतील सर्व शाळा आणि शैक्षणिक संस्था १ नोव्हेंबरपासून पुन्हा सुरू करण्यास परवानगी दिली जाईल. कोणत्याही मुलांना शाळेत येण्यास भाग पाडले जाणार नाही. अभ्यास ऑफलाइन आणि ऑनलाइन दोन्ही माध्यमातून चालेल याची काळजी घेतली जाईल असे दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी सांगितले. दिल्लीच्या शाळांमध्ये पालक संवाद कार्यक्रम दिल्लीच्या सरकारी शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांच्या पालकांशी नियमितपणे संपर्क साधला जाणार आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी गुरुवारी 'पालक संवाद' कार्यक्रमाचा शुभारंभ केला. 'पालक संवाद: चला पालकांशी बोलूया' असे या कार्यक्रमाचे नाव असून या कार्यक्रमांतर्गत १८ लाखांहून अधिक पालकांशी थेट संपर्क साधला जाईल असे सिसोदिया यांनी यावेळी सांगितले. त्यागराज स्टेडियममध्ये कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सर्वसाधारणपणे पालकांद्वारे दोन प्रकारची काळजी घेतली जाते. एकतर विद्यार्थ्यांची अजिबात काळजी घेतली जात नाही किंवा प्रमाणापेक्षा जास्तच काळजी घेतली जाते. हे दोन्ही प्रकार मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी हानिकारक आहेत असे मनिष सिसोदिया म्हणाले. पालक एकतर मुलांचे बॉस बनतात आणि त्यांना सूचना देतात किंवा पालकांची नवीन पिढी मुलांना मित्र बनविण्याचा प्रयत्न करते. पण मुलांना फक्त पालक हवे असतात. बॉस किंवा मित्र नको असतात. त्यांच्या आयुष्यात ही भूमिका साकारण्यासाठी वेगवेगळे लोक असतात असेही ते म्हणाले.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3EvEoTP
via IFTTT

Post a Comment

0 Comments