शाळा तूर्त बंदच! मुंबई, ठाणे, नवी मुंबईत पहिली ते सातवीचे विद्यार्थी घरातच

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया, तसेच राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे हे दोघेही, 'देशात-राज्यात ओमायक्रॉनचा एकही रुग्ण अद्याप सापडलेला नाही... विनाकारण दहशतीखाली राहू नका', असा धीराचा सूर लावत असताना, आज, बुधवारपासून सुरू होण्याची आशा असलेल्या राज्यातील अनेक शहरांत बंदच राहतील, हे स्पष्ट झाले आहे. ओमायक्रॉनची धास्ती त्यास कारणीभूत ठरली आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, नाशिक आदी शहरांतील इयत्ता पहिली ते इयत्ता सातवीच्या शाळा आता १५ डिसेंबर वा त्यानंतरच सुरू होऊ शकतील. मुंबईसह राज्यभरातील करोनास्थिती झटाट्याने निवळत असताना पहिली ते सातवी इयत्तांच्या शाळा १ डिसेंबरपासून सुरू होतील, अशी अपेक्षा होती. तब्बल २० महिने शाळांचे तोंडही न पाहिलेले विद्यार्थी व त्यांचे पालकही शाळांचे दार उघडण्याच्या प्रतीक्षेत होते. शाळा सुरू करताना कोणते नियम पाळावेत, याबाबतच्या मार्गदर्शक सूचनाही राज्यात जारी करण्यात आल्या होत्या. अर्थात, शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेण्याचे सर्वाधिकार स्थानिक महापालिका, पालिका यांच्यावर सोपवण्यात आले होते. आणि याच पार्श्वभूमीवर ओमायक्रॉनची जोरदार चर्चा सुरू झाल्याने अनेकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली होती, व मंगळवारी ती खरी ठरली. ओमायक्रॉनच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर मुंबईचे महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल आणि शालेय शिक्षणाशी संबंधित अधिकाऱ्यांमध्ये मंगळवारी महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत शाळा १ डिसेंबरऐवजी १५ डिसेंबर रोजी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. साधारणपणे मुंबई महापालिका जो निर्णय घेते त्याच मार्गावर ठाणे महापालिका जाते, असे करोनाकाळात सातत्याने दिसून आले. शाळांच्या निर्णयबाबतची त्याचीच पुनरावृत्ती झाली. ठाण्यातील शाळा १५ डिसेंबरनंतर सुरू होतील, असे ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी सांगितले. कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई येथील शाळाही आता १५ डिसेंबर वा त्यानंतरच सुरू होतील. वसईतील शाळांबाबत काहीशी संभ्रमाची स्थिती होती. पालघरमधील शाळा मात्र आज, बुधवारी सुरू होतील. किचकट नियमांचे आव्हान राज्यातील सुरू असलेल्या शाळांसाठी आज, बुधवारपासून नवी मार्गदर्शक तत्वे लागू असतील. शाळा सुरू करताना सहा फुटांचे अंतर ठेवून विद्यार्थ्यांना बसविण्याचे मोठे आव्हान शाळांपुढे असेल. याचबरोबर शासन निर्णयानुसार तीन तास प्रत्यक्ष शाळा झाल्यानंतर पुढील तीन तास जे विद्यार्थी शाळेत आलेले नसतील त्यांचे ऑनलाइन वर्ग घ्यावेत, अशा सूचना दिल्या आहेत. यामुळे शिक्षकांच्या कामाचे तासही वाढणार आहेत. याचबरोबर शिक्षकांना एकच पाठ तीन वेळा शिकवावा लागणार आहे यामुळे त्यांच्यावर ताण येण्याची शक्यता आहे. आता नाताळनंतरच? गेल्या वर्षीही करोनामुळे पहिली ते सातवीच्या शाळा बंद होत्या. आता शाळा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली. मात्र, नव्या विषाणूच्या प्रादुर्भावामुळे हा निर्णय पुढे ढकलला गेला. पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार बहुतांश शाळांना नाताळची सुटी असते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत शाळा सुरू करायच्या झाल्यास त्या थेट नव्या वर्षात म्हणजेच २०२२ मध्येच सुरू होतील, असेच चित्र आहे. हेही वाचा:


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3IkrrPF
via IFTTT

Post a Comment

0 Comments