अभ्यास तोंडपाठ, लेखनात सपाट! ऑनलाइन शिक्षणामुळे मुलांच्या लेखनक्षमतेवर परिणाम

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई इयत्ता पहिलीपासून ते दहावीपर्यंत अनुत्तीर्ण करणारी एकही परीक्षा झालेली नाही. त्यातच करोनासंकटामुळे दीड वर्षाहून अधिक काळ विद्यार्थ्यांची शाळा ऑनलाइनच भरली. आता प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्यानंतर उत्तरपत्रिका लिहिताना दहावीच्या विद्यार्थ्यांच्या लेखन, आकलन क्षमतेवर झालेला परिणाम पाहून पालक आणि शिक्षकांची चिंता वाढली आहे. गणित, विज्ञान आणि भाषा विषयात विद्यार्थी पडत मागे असल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे. यामुळे करोनापूर्वी शाळांमध्ये २० ते २५ टक्के विद्यार्थी शैक्षणिक प्रगतीच्या वाटेवर मागे पडत असल्याचे चित्र होते. आता हे प्रमाण ४५ ते ५० टक्क्यांपर्यंत पोहोचल्याचे मुख्याध्यापक सांगत आहे. राज्यात शिक्षण हक्क कायदा लागू झाल्यानंतर पहिली ते आठवीपर्यंत नापास न करण्याच्या नियमामुळे विद्यार्थी शैक्षणिक गुणवत्तेत मागे पडत असले तरी पुढील वर्गात जात होते. हेच विद्यार्थी गतवर्षी इयत्ता नववीमध्ये होते. करोनाच्या पार्श्वभूमीवर या विद्यार्थ्यांना सराव परीक्षा, घटक चाचण्या आदींच्या आधारे मूल्यमापन करून इयत्ता दहावीमध्ये प्रवेश देण्याबाबत सांगण्यात आले होते. या विद्यार्थ्यांनी आठवीच्या वार्षिक परीक्षेपासून आतापर्यंत शाळांनी घेतलेल्या विविध परीक्षा ऑनलाइन स्वरूपातच दिल्या. काही शाळांनी घरी प्रश्नपत्रिका पाठवून लेखी परीक्षाही घेतली. मात्र त्यावेळीही बहुतांश विद्यार्थ्यांनी उत्तरे पुस्तकातूनच उतरवल्याचे शिक्षक सांगतात. यानंतर इयत्ता दहावीचे वर्षही ऑनलाइन सुरू झाले. मात्र ऑक्टोबरमध्ये जेव्हा प्रत्यक्ष शाळा सुरू झाली आणि शाळांनी सराव परीक्षांचे आयोजन केले तेव्हा प्रत्यक्ष पेपर लिहिताना विद्यार्थ्यांच्या लेखनक्षमतेवर परिणाम झाल्याचे आढळून आले. शिक्षकांनी नोंदवलेल्या चिंता शाळांमध्ये परीक्षांचे आयोजन केल्यावर अनेकांच्या पेपर लिहून पूर्ण झाले नव्हते. तर अनेकांना नेमके काय लिहायचे हे समजत नव्हते. अनेकांना उत्तरे माहिती होती, मात्र मांडता येत नव्हती. या परीक्षेनंतर अशा अनेक समस्यांनी डोके वर काढले आहे, असे घाटकोपर येथील के. व्ही. के घाटकोपर सार्वजनिक शाळेचे मुख्याध्यापक जगदीश इंदलकर यांनी निरीक्षण नोंदविले. आतापर्यंत दहावीच्या वर्गात अध्यापन करत असताना कमी गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांवर अधिक मेहनत घेतली जात असे. करोनापूर्वी हे प्रमाण २० ते २५ टक्के असायचे. आता मात्र ते ५० टक्क्यांपर्यंत पोहचल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे काही शाळांनी नाताळच्या सुट्टीत पालकांच्या मदतीने विशेष वर्गांचे आयोजन केल्याचेही इंदलकर म्हणाले. तर या परीक्षांनंतर शाळांची निकालाची चिंता वाढली आहे. शहरी भागात अनेक पालक विद्यार्थ्यांना शाळेत पाठवत नाहीत. त्यामुळे अशा पालकांनी स्वयंअध्ययनावर विशेष भर देणे आवश्यक आहे, असे राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे प्रवक्ते महेंद्र गणपुले यांनी सांगितले. यावर्षी घरच्या परिस्थितीमुळे अनेकांना अभ्यासास पोषक वातावरण नसले तरी आता अंतिम टप्प्यात त्यांनी युक्तीने अध्यापन आणि अध्ययन पूर्ण केले तर नक्कीच त्याचा फायदा विद्यार्थ्यांना होऊ शकतो, असेही ते म्हणाले. काय आहेत उपाय? दीड वर्षाहून अधिक काळ ज्यांना ऑनलाइन आणि ऑफलाइन असे कोणतेच शिक्षण घेता आले नाही, अशा विद्यार्थ्यांची अभ्यासाची स्थिती अतिशय चिंताजनक आहे, असे कुर्ला येथील गांधी बाल मंदिर हायस्कूलचे शिक्षक व समुपदेशक जयवंत कुलकर्णी यांनी नोंदविले. या विद्यार्थ्यांना अतिरिक्त वेळ देऊन उपचारात्मक अध्यापन करणे, प्रत्येक विषयाच्या कमी गुणांच्या चाचण्या घेत गुणात्मक सुधारणा करणे, इंग्रजी, गणित आणि विज्ञानाच्या मागील इयत्तांच्या आवश्यक मूलभूत संकल्पना समजावून देणे, वाचन आणि लेखन सुधारण्यासाठी वैयक्तिक लक्ष पुरविणे यासारखे तातडीचे उपाय शाळेत होणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले. गणिताची वजाबाकी करोनाकाळात ६७ टक्के विद्यार्थ्यांना शिक्षकांच्या आधाराशिवाय गणित हा विषय अवघड वाटू लागल्याचे 'ब्रेनली'ने केलेल्या एका पाहणीत दिसून आले आहे. तर ६९ टक्के विद्यार्थ्यांना ऑफलाइनपेक्षा ऑनलाइन गणित शिकणे आव्हानात्मक वाटत असल्याचेही यामध्ये समोर आले आहे. यासाठी १७०० विद्यार्थ्यांची पाहणी केली आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3szKQX6
via IFTTT

Post a Comment

0 Comments